प्रत्येकाला आपल्या आईबाबांचा संघर्ष माहिती असतो. मीही माझ्या आईबाबांचा संघर्ष पाहिलेला.
तोच डोळ्यासमोर ठेऊन ही कादंबरी रचली.
वडिलांचे नाव अरुण तर आईचे नाव छाया. अरुण म्हणजे सूर्य आणि छाया म्हणजे सावली. त्या दोघांच्या नावावरुनच मी या कादंबरीचे नाव सूर्याची सावली ठेवलं.
आजवर मी कुठंच कादंबरीचे नाव असं का ठेवलं याचा उलगडा केला नव्हता. आठ वर्षानंतर कादंबरीच्या नावाचा उलगडा करण्याचं कारण म्हणजे आता आयुष्यात फक्त सावली उरली आहे. दोन वर्षांपूर्वीच सूर्याचा अस्त झाला.
असो.
सूर्याचं आणि सावलीचं नातं जसं अजरामर आहे तसंच बापलेकाचं नातंही भावनेने बांधलेलं आहे. सूर्याची सावलीमध्ये अशाच भावनेच्या धाग्यानं गुंफलेलं कथानक आहे. प्रकाशक शरद तांदळे आणि अमृता तांदळे यांच्या न्यू ईरा प्रकाशनच्या माध्यमातून हे कथानक कादंबरीच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहचण्यासाठी सज्ज होत आहे, याचा खरोखरच आनंद आहे. शेवटचं एवढच सांगेल, पुरुष बाप होतो, तेव्हा त्याच्यातली आई जन्म घेते.

