Payal Books
Kalokhi Pournima काळोखी पोर्णिमा By Narayan Dharap
Couldn't load pickup availability
पडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती. शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.
असे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली. तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली. तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते.
ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच. एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही. तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.
शेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.'
